मुंबई : जसजशी लोकसभा निवडणुका जवळ येत आहे, तसा राम मंदिराचा विषय अधिक गडद करण्याचा प्रयत्नं सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात श्री. रामचा भव्य पुतळा उभारण्याचे संकेत दिले होते. त्याला अनुसरूनच मित्र पक्ष शिवसेनेने सामना या मुखपत्रातून मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.
अयोध्येत श्रीरामाचा पुतळा उभारण्याची घोषणा भारतीय जनता पक्षाकडून केली आहे. त्यावरून शिवसेनेने भाजपला चांगलेच सुनावले आहे. सध्या इंडोनेशिया, मॉरिशससारख्या देशांत आणि नेपाळमध्ये राममंदिरे भव्य मूर्तीसह उभी राहत आहे. परंतु, आता रामाची एक मोठी पुतळावजा मूर्ती उभी करून तुम्ही कोणत्या झाडाची पाने देशातील हिंदूंच्या तोंडास पुसत आहात, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे. तसेच आजवर आम्हाला “बोधीवृक्ष”ज्ञात होता, परंतु आता जनतेच्या तोंडास पाने पुसण्याचा जो “मोदी-वृक्ष” निर्माण झाला आहे आणि त्या झाडाची पाने पाचोळ्यासारखी अयोध्येत सुद्धा उडू लागली आहेत. त्यामुळे पुतळ्याचे लॉलीपॉप दाखवणाऱ्यांपासून हिंदूंनी सावध राहावे, असे उद्धव ठाकरे यांनी सामनातून म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येमध्ये श्रीरामाचा ब्रॉन्झचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. २५ वर्षांपूर्वी भाजपाने राम जन्मभूमीवरच मंदिर उभारायचे. मंदिर वही बनाएंगे म्हणजे बनाएंगेच, अशा मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. यासाठीच अयोध्येत मोठे आंदोलन पेटले होते आणि त्यात शेकडो कारसेवकांनी आहुती दिली होती. आणि कारसेवकांच्या त्या आहुतीतूनच भाजपाच्या डोक्यावर आजचा राजमुकुट चढला आहे. मात्र आता राममंदिराचा विषय बाजूला सारून अयोध्येत श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.
