मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई कांदिवली येथे उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, उत्तर भारतीयांच्या बाबतीत ते नेमकी कोणती भूमिका मांडतात यावर प्रसार माध्यमं आणि सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. भाषणातील मराठीचा हिंदीत अनुवाद करताना चुकीची माहिती हिंदी भाषिक राज्यांमध्ये प्रसारित केली जाते, त्यामुळे त्यांनी हा संवाद देशभर समजावा म्हणून हिंदीत भाषण केले.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मतांकडे डोळा ठेवून हे राजकारण करत आहेत का? आणि त्यांची मराठी बद्दलची भूमिका बदलली का? असे एक ना अनेक प्रश्न प्रसार माध्यमांवर चर्चेला आले होते. परंतु, एकूण संवादानंतर संपूर्ण चित्र पालटल्याचे दिसत आहे. कारण यावेळी राज ठाकरे यांनी मराठीची कडवट भूमिका मांडल्याने, ते होते त्यापेक्षाही कडवट मराठी असल्याचे सिद्ध झाले आहे.

मराठीच्या भूमिकेवरून घुमजाव तर सोडा उलट त्यांनी उत्तर भारतीयांनाच इथल्या संस्कृतीप्रमाणे बदलण्याचा सल्ला दिला. उत्तर भारताच्या पूर्ण इतिहासच त्यांनी येथे मांडला आणि कायदा काय सांगतो हे सुद्धा उदाहरणं देऊन स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र आणि इथल्या राजकारण्यांना दोष देण्यापेक्षा तुम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारमधील राजकारण्यांना प्रश्न विचारा असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.

भारताच्या आजवरच्या सर्व पंतप्रधानांची यादीच त्यांनी यावेळी मांडली आणि शेवटी नरेंद्र मोदींचा मतदार संघ कोणता असा प्रश्न उपस्थित करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकली. तसेच गुजरातमधील उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्याचा हवाला देत त्यांनी या घटनेवेळी भाजप, उत्तर भारतीय नेते, अमित शहा आणि स्वतः मोदी का गप्प होते, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मुंबई आणि ठाणे शहरांमध्ये उफाळून आलेल्या फेरीवाल्यांच्या संघर्षाचं मुख्य कारण हे इथल्या उत्तर भारतीय नेत्यांचं कृत्य हेच होतं, असं राज ठाकरे यांनी ठणकावलं.

दरम्यान, बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे केवळ इथल्या मूळ मराठी लोकांनाच नाही तर पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या अमराठी लोकांना सुद्धा त्रास होत आहे, असं त्यांनी अधोरेखित केले. महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींवर सर्वप्रथम मराठी युवक-युवतींचाच अधिकार आहे आणि जर तो मिळणार नसेल तर संघर्ष तर अटळ आहे असे ते म्हणाले. मी येथे स्पष्टीकरण देण्यासाठी नव्हे तर भूमिका स्पष्ट करण्यासाठी आलो आहे आणि मी माझ्या पूर्वीच्या भूमिकांवर आजही ठाम आहे, असं त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्पष्ट केले. त्यांनी हिंदीत संवाद साधल्याने हिंदी प्रसार माध्यमं तोंडघशी पडल्याची चर्चा रंगली आहे.

mns chief raj thackeray strongly support marathi on uttar bharatiy panchayat communication