मुंबई : मागील दोन तीन दिवसांपासून चाललेल्या मुंबई काँग्रेस कमिटीच्या बैठकीत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबईतील लोकसभेच्या जागेसाठी पक्षाकडून उमेदवारी देण्यास स्थानिक काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला होता. दरम्यान, राज्य काँग्रेस संसदीय कमिटीने सुद्धा काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावनांची गंभीर दखल घेत, निरुपम यांना उत्तर मुंबई या त्यांच्या मूळ लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, काँग्रेस कमिटीच्या बैठकीत माजी खासदार मिलिंद देवरा, माजी आमदार कृपाशंकर सिंग तसेच अनेक सदस्यांनी निरुपम यांच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी विरोध दर्शवला. त्यानंतर पक्षातून चुकीचा संदेश जाऊ नये आणि पक्षांतर्गत मतभेद वाढू नये म्हणून काँग्रेस राज्य कमिटीने संजय निरुपम यांना उत्तर मुंबई मतदारसंघावर ठाम राहण्यास सांगितले. असा संपूर्ण घटनाक्रम घडला असताना सुद्धा काल संजय निरुपम यांना सदर विषयावर प्रश्न विचारला असता, मी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात काम केलेलं आहे आणि याच मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचा पुनरोच्चार केला आणि एकप्रकारे काँग्रेस कमिटीला अप्रत्यक्ष आवाहन दिले आहे.
त्यानंतर काँग्रेस पक्षाचे अंतर्गत आदेश झुगारून संजय निरुपम यांनी स्वतःची उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून स्वयंघोषित उमेदवारी घोषित केल्याची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये रंगली आहे. दरम्यान, कॉग्रेस पक्षाच्या मुंबईतील बैठकीत संजय निरुपम हे स्वतः मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने त्यांनी स्वतःचा उत्तर मुंबई हा लोकसभा मतदारसंघ सोडून, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर दावा करून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश देऊ नये, अशी समज देण्यात आली होती. त्यानुसार पक्षातील कोणत्याही इच्छुक उमेदवारांनी स्वतःचे मूळ मतदासंघ दुर्लक्षित करून इतर लोकसभा मतदारसंघातुन उमेदवारी मागू नये, अशा सक्त सूचना काँग्रेस कमिटीने यापूर्वीच दिल्या होत्या.
दुसरं म्हणजे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा दिवंगत खासदार गुरुदास कामत यांचा मतदारसंघ असून देखील, काँग्रेस पक्षातील वरिष्ठांच्या कोणत्याही आदेशाची प्रतीक्षा न करता संजय निरुपम यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून थेट अप्रत्यक्ष आणि स्वयंघोषित उमेदवारी जाहीर करून एकप्रकारे काँग्रेस वरिष्ठांकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये रंगली आहे. त्यामुळे कॉग्रेस हायकमांड संजय निरुपम यांच्या बाबतीत नेमका कोणता निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.
