मुंबई : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि सर्वच पक्ष प्रचाराला लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या मालिका सुरु झाल्या असल्या तरी एक गोष्ट सहज जाणवते आणि ती म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख मतदाराला शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांच्या कोणत्याही विकास कामांचा पुरावा देताना दिसत नाहीत.
विशेष म्हणजे त्यांनी विकास कामं न करता ५ वर्ष केवळ राजीनामा नाट्य केली आणि आमच्या आमदार तसेच खासदारांची कामच भाजप करत नसल्याचा आरोप ५ वर्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे केला. त्यात सध्या काँग्रेसमध्ये आलेले विदर्भातील आमदार धानोरकर यांनी पक्षाच्या भर सभेतच शिवसेनेचे डझनभर मंत्री काहीच कामाचे नसल्याचा जाहीर आरोप देखील केला होता.
उद्धव ठाकरे यांची भाषणं आणि त्यातील विषयांचे निरीक्षण केल्यास ते हिंदुत्व आणि इतर अर्थहीन, ज्याने सामान्य माणसाच्या आयुष्यातील प्रश्न मिटत नाहीत असेच विषय उचलून धरत आहेत. वेळोवेळी पळकुटी भूमिका घेऊन देखील आम्ही वाघ आहोत हेच त्यांचे कंटाळवाणे जुने विषय भाषणात उपस्थितांच्या कानावर पडत आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवर देखील उद्धव ठाकरे यांनी आता वायफळ मुद्दे सोडून, शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांनी कोणाही राज्यस्तरीय विकासाची कामं ५ वर्ष सत्ता उपभोगून केली आहेत ते आधी सांगावं असं म्हटलं आहे.
