आसाम : काल देशभरात एकूण ११७ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र अनेक ठिकाणी EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याचे पाहायला मिळाले. २०१४ पासून मोदी सरकारच्या निवडणुकीतील यशामागे ईव्हीएम’मधील छेडछाड देखील एक मुख्य कारण असल्याचा आरोप देखील विरोधकांनी नेहमीच केला आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाकडे याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर व्हीव्हीपॅट मशिन्स बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि मतदानानंतर मतदाराला त्याद्वारे अधिकृत पावती दिली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं. मात्र त्यानंतर देखील अनेक ठिकाणी चुकीच्या प्रकारे विषय हाताळला गेल्याच्या तक्रारी दिवसभर अनेक मतदारसंघातून आल्या होत्या.
मात्र आता आसाममधील एका जवाबदार व्यक्तीने त्याबाबतीत भाष्य केल्याने त्याला दुजोरा मिळाला आहे. आसामचे माजी डीजीपी हरेकृष्णा डेका यांनी काल २३ एप्रिलला लचित नगर एलपी शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केलं. त्यावेळी त्यांनी ज्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं त्याच्या नावाची पावती व्हीव्हीपॅट मशिन्समधून न मिळता दुसऱ्याच उमेदवाराची पावती हाती आली, ज्याला मी मतदानच केलं नाही. त्यामुळे त्यांनी सदर माहिती उपस्थित पत्रकारांच्या देखील निदर्शनास आणून दिली. त्यामुळे ही घटना लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेमधील एक भयानक विषय आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे मी जर याबाबत तक्रार केली तर मला ते सिद्ध करावं लागेल, नाहीतर मलाच यामध्ये दोषी ठरवून शिक्षा ठोठावली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. तरी मी प्रयत्न करेन कि हे कसं सिद्ध करता येईल, अशी प्रक्रिया नोंदवून तेथून निघून गेले.
