Brand Rahul Gandhi | कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर कॉंग्रेस उत्साहात आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन मोठ्या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे नियोजन काँग्रेस पक्षाने सुरू केले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्लीत मध्य प्रदेशातील नेत्यांची भेट घेतली.
काँग्रेसचा दिल्लीत आणि मध्य प्रदेशात बैठकांचा सपाटा
या बैठकीला मध्य प्रदेशचे दोन माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत खर्गे आणि राहुल गांधी यांनी क्षेत्रनिहाय आराखडा तयार केला आणि कोणत्या मुद्द्यांवर पुढे केंद्रित राहायचं, याबाबत नेत्यांकडून अभिप्राय घेतला. तसेच स्थानिक मुद्दे आणि महागाई तसेच बेरोजगारीचा मुद्दा उचलून धरताना भाजपची धामिर्क मुद्द्यांची रणनीती कशी त्यांच्यावरच उलटून लावायची यावर सखोल चर्चा झाली.
दरम्यान, भाजप काय मुद्दे पुढे करेल याचे आधीच अंदाज तयार केले आहेत आणि त्यासाठी टीम कामाला लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण काँग्रेससाठी ऊर्जा देणारं आहे असं वृत्त आहे. कारण मध्य प्रदेशात देखील काँग्रेस बहुमताने सत्तेत येण्याचे अंतर्गत सर्व्हे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत.
मध्य प्रदेशात १५० हून अधिक जागा जिंकू – राहुल गांधी
या बैठकीनंतर काँग्रेस किती उत्साहात आहे, हे राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरूनही समजू शकते. बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले की, आम्ही नुकतीच सविस्तर चर्चा केली आहे. आम्ही केलेल्या अंतर्गत मूल्यमापनाप्रमाणे काँग्रेसने कर्नाटकात १३६ जागा जिंकल्या. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात आम्ही १५० हून अधिक जागा जिंकू असं राहुल गांधी म्हणाले.
मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. 2018 मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि सरकार स्थापन केले. पण काही काळानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडखोरीमुळे भाजप पक्ष पुन्हा सत्तेत आला होता. विशेष म्हणजे मध्य प्रदेशात देखील राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद मिळाला होता.
News Title : Brand Rahul Gandhi will effect in Madhya Pradesh Assembly Election check details on 29 May 2023.
