चंदौली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजे ७व्या टप्प्यातील मतदानासाठी मतदारांकडून आज सकाळपासून सुरूवात झाली आहे. परंतु, युपीच्या चंदौली लोकसभा क्षेत्रातून एक अतिशय धक्कादायक वृत्त आहे. येथे मतदानाच्या एक दिवस आधीच मतदारांच्या बोटावर जबरदस्तीने शाई लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, चंदौली लोकसभा क्षेत्रातील तारा-जीवापूर गावात दलित वस्तीतील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर मतदान करु नये यासाठी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. ‘शनिवारी ७व्या टप्प्यातील मतदानाच्या १ दिवस आधी ३ जण गावात आले. त्यांनी आमच्या बोटावर बळजबरी शाई लावली आणि आम्ही आम्ही मतदान करु नये यासाठी त्यांनी ५०० रुपये देखील दिले. ते तिघंही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते’ असं स्थानिक गावकऱ्यांनी सांगितलं.

वृत्तसंस्था एएनआयला एका गावकऱ्याने सांगितल्यानुसार, ‘ते लोक भारतीय जनता पक्षाचे होते आणि त्यांनी आम्ही पक्षाला मतदान करणार की नाही अशी विचारणा केली. त्यानंतर बोटाला बळजबरी शाई लावून झाल्यावर आता तुम्ही मतदान करु शकणार नाहीत, याबाबत कोणाला काहीही सांगू नका असं ते म्हणाले’.

५०० रुपये देऊन भाजपने बोटावर बळजबरी शाई लावली व मतदान करु नये सांगितलं