मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तार १४ जून म्हणेजच उद्या होणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु, मंत्रिमंडळ विस्तारावरून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत सध्या मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरु आहे. त्यामुळे, हा मंत्रिमंडळ आता लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे यंदाची विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा मागील अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहे. तसा आग्रहच पक्षाच्या अनेक नेत्यांकडून आणि आमदारांकडून केला जात आहे.
भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद किंवा दोन मंत्रीपदांची ऑफर देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीर शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी सुभाष देसाईं यांचे नाव पुढे येताना दिसत असले तरीही शिवसेनेतील अनेक नेत्यांचा त्यांच्या नावाला पाठिंबा नसल्याचे समजत आहे. दरम्यान, दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी यंदाची विधानसभा लढवावी, अशी इच्छा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत असली तरी आज ‘मातोश्री’वर झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याबाबतच्या प्रश्न उत्तर देणे टाळले आहे.
आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभा लढतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. काहीच दिवसांपूर्वी युवासेनेचे सरचिटणीस आणि आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवर टाकलेल्या एका पोस्ट्समुळे या चर्चांना उधाण आले होते. “हीच वेळ आहे, हीच संधी. लक्ष्य विधानसभा २०१९. महाराष्ट्र वाट पाहतोय”, असा मजकूर लिहीत वरुण सरदेसाई यांनी आपल्या इंस्टाग्रामवर आदित्य ठाकरे यांना मिठी मारत असल्याचा एक फोटो शेअर केला होता.
