मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबईतील मागाठाने विधानसभा भाजप – शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे उपस्थितांना संबोधित करताना, कोकणातले शिवसैनिक हे खेकड्यासारखे असल्याचं विधान खुद्द शिवसेनेचे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केल्याने संपूर्ण शिवसेनेत रोष व्यक्त करण्यात आला होता. त्यावेळी अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि शिवसेना मंत्री रामदास कदम, इतर स्थानिक आमदार यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत थेट मातोश्रीने दखल घ्यावी अशी मागणी केली होती.
दरम्यान, २ दिवसांपूर्वी कोकणातील चिपळूण येथे झालेल्या तिवरे धरण फुटीच्या घटनेनंतर त्यात शिवसेनेतील स्थानिक आमदारच कॉन्ट्रॅक्टर असल्याचं चौकशीत बाहेर आलं होतं. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेणाऱ्या मंत्री तानाजी सावंत यांनी स्थानिकांसोबत केलेल्या वरवरच्या चर्चेअंती सर्व दोष खेकड्यांना दिला होता आणि त्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यावेळी एका भाषणात शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी कोकणातले शिवसैनिक हे खेकड्यासारखे असल्याचं विधान केल्याने शिवसैनिक संतापले आणि मातोश्रीवर विषय घेऊन गेले होते. मात्र सध्या तिवरे धरणाच्या दुर्घनेनंतर अनेकांचे बळी जाऊन देखील सर्व शिवसैनिक शांत असल्याने नेटकऱ्यांनीच शिवसेनेला त्यांच्या खेकडा वृत्तीची आठवण करून देत आधीच्या घटनांना उजाळा दिला आहे.
त्यावेळी आमदार प्रकाश सर्वे यांच्या विधानावर संताप व्यक्त करत थेट मंत्री रामदास कदम यांचं कार्यालय गाठत, कार्यक्रमाची धवनीचित्रफीत सादर केली होती आणि मातोश्रीच्या भेटीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र तेच शिवसैनिक आज शांत बसून आहेत आणि त्यांना कोकणात घडलेल्या घटनेला खेकडे जवाबदार असल्याच्या विधानाविरोधात कोणताही आक्षेप नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे एकाच विषयावर शिवसेना किती दुतोंडी भूमिका घेते याचा हा जिवंत पुरावा आहे, ज्याची आठवण समाज माध्यमांनी शिवसेनेला करून दिली आहे.
