मुंबई : मुंबईमध्ये पावसाने उसंत घेतली असली तरी दुर्घटना थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कारण आज मुंबईच्या डोंगरी तेथे कौसरबाग इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. पाऊस नसला तरी अरुंद रस्त्यांमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होतं आहेत. घटनास्थळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांना स्थानिकांच्या प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं. आता या घटनेला कोण जबाबदार असा जाब स्थानिकांनी महापौरांना विचारात संताप व्यक्त केला.

दरम्यान स्थानिकांच्या रोषाला उत्तर देताना ही वेळ दोषी कोण हे शोधण्याची नसून जे ढिगाऱ्याखाली अडकले आहेत त्यांना वाचवण्याची आहे असे सांगत महापौरांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. एकदा मदत आणि बचावकार्य संपलं आणि लोकांना सुखरुप बाहेर काढलं की या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर योग्यती कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी स्थानिकांना दिलं.

मुंबईतल्या डोंगरी भागात कौसरबाग इमारत कोसळून तब्बल १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळताच गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली. सदर घटनेत बचावकार्यात आत्तापर्यंत ७ जखमींना ढिगाऱ्याबाहेर सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून, त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणी विकासकाची कसून चौकशी केली जाईल असे म्हटले आहे. आज सकाळी ११.३० वाजता कौसर बाग इमारत कोसळली. या इमारतीत एकूण १२ ते १५ कुटुंबं रहात होती त्यामुळे ढिगाऱ्याखाली ४० जण अडकल्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

डोंगरी दुर्घटना: महापौरांच्या भेटीदरम्यान स्थानिकांचा रोष