मुंबई : संपूर्ण देशात प्लॅस्टिकबंदी कायदा करून कडक अंमलबजावणी करा, अशी मागणी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी लागू झाली असून अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतु आता ‘सिंगल यूज’ प्लॅस्टिक देशातून हद्दपार करण्याची गरज असून त्यासाठी कठोर कायदा करून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला तेव्हा त्यांनी हे भाष्य केलं.

प्लॅस्टिकला पर्याय आहे. त्यासाठी शिवसेना व युवासेनेच्या वतीने महापालिकेच्या माध्यमातून सर्वत्र जनजागृती केली जात असून लवकरच प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ब्लू स्कॉर्ड सक्रीय होईल, असे त्यांनी म्हटले. मुंबईत सर्व शाळांमध्ये कापडी पिशव्यांचे वितरण केले जात असून त्यामुळे महिला बचत गटालाही रोजगार निर्माण झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महाराष्ट्रासह १६ देशांमध्ये प्लॅस्टिकबंदी असल्याची त्यांनी आठवण करून दिली.

दरम्यान, स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्लॅस्टिकचा वापर बंद व्हायला हवा, असे सांगत २ ऑक्टोबरपासून त्यासाठी मोहीम हाती घेण्यात येईल, असे म्हटले होते. याबाबत आदित्य ठाकरेंनी मोदींचे अभिनंदन केले. प्लॅस्टिकला पर्याय आहे आणि त्यासाठी शिवसेना व युवासेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वत्र जनजागृती केली जात असून लवकरच बंदी असलेले प्लॅस्टिक वापरणार्‍यांविरुद्ध कारवाई करणारे ब्लू स्कॉडही सक्रिय होईल असे त्यांनी सांगितले.

देशभरात प्लॅस्टिक बंदी कठोरपणे करा: आदित्य ठाकरे