माणगांव: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एका एसटीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वडपाले गावाजवळ ही घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एसटीमध्ये ६० प्रवासी असून ते थोडक्यात बचावल्याची माहिती मिळत आहे. परंतु या भीषण आगीत एसटी जळून खाक झाली आहे.
बसला आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश भक्तांना घेऊन ही बस मुंबईतील परळ येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे जात असताना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास माणगावजवळ वडपाले येथे बसने अचानक पेट घेतला. यावेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. सुदैवाने त्यांना तातडीने बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे ते थोडक्यात बचावले, परंतु त्यांचे सामान जळून खाक झाल्याची माहिती आहे. सर्वजण गणेशोत्सवासाठी गावी निघाले होते. दरम्यान अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती, सध्या वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याची माहिती आहे.
मुबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पुण्याकडील मार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पेण ते माणगाव दरम्यान झालेली वाहतूक कोंडी मोठी आहे. या वाहतूक कोंडीमुळे पहाटे कोकणाकडे निघालेले चाकरमानी अडकून पडले आहेत. महाडजवळील वडपाले गावाजवळ चिपळूणला जाणाऱ्या एका एसटी बसला अचानक आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
