नवी दिल्ली: बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा शिवसेनेकडं नाही. त्यामुळं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेची मदार असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला ‘हात’ देते का? यावरच शिवसेनेचं मुख्यमंत्रीपदाच स्वप्न अवलंबून आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून पंधरा दिवस लोटले आहेत. बहुमत मिळालेल्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांची महायुती मुख्यमंत्रीपदारून दुभंगल्यानं भारतीय जनता पक्षानं सरकार स्थापन करण्यास नकार दिला. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याचं सांगितलं.

शिवसेना खासदार संजय राऊत आज दिल्लीला जाणार आहेत. काँग्रेस-एनसीपी’च्या पाठिंब्यासाठी शिवसेना कसरत करत होणार आहे. सत्तास्थापनेसाठी आज दिल्लीपासून मुंबईत अनेक महत्वपूर्ण बैठकी होत आहे. शिवसेना आमदारांची बैठक सकाळी ९.३० च्या सुमारास द रिट्रिट हॉटेलमध्ये होणार आहे. या बैठकीत शिवसेना आमदारांकडून समर्थन पत्रावर सह्या घेणार येणार असल्याची माहिती आहे. तर राज्यात घडणाऱ्या वेगवान घडामोडीनंतर एनसीपीच्या कोअर कमिटीची बैठकही बोलविण्यात आली आहे. या बैठकीत काँग्रेसची भूमिका काय असेल त्याची वाट पाहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी दावा करण्यासाठी आमचा आणि काँग्रेसचा पाठिंबा घ्यायचा असेल, तर त्यांना भारतीय जनता पक्षाप्रणित रालोआतून बाहेर पडावे लागेल. केंद्रात मंत्रिपद ठेवून राज्यात वेगळी भूमिका घेता येणार नाही, हे शिवसेनेने आधी स्पष्ट करावे. त्यानंतर आमच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेकडून रीतसर प्रस्ताव आल्यास त्यावर आम्ही विचार करू, असे एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांना सांगितले. आमची तसेच काँग्रेसची निवडणूकपूर्व महाआघाडी होती. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा, हे दोन्ही पक्षांना मिळून ठरवावे लागेल, असेही ते म्हणाले.

आज राज्यातील सत्तास्थापनेवरून दिल्लीत खलबतं