मुंबई: महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वैचारिक मतभेद दूर लोटून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार का?, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना व याबाबत अनेक उलटसुलट बातम्या क्षणाक्षणाला येत असताना त्याचं उत्तर ‘होय’ असं मिळालं आहे. सोनिया गांधी यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तत्पूर्वी, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले होते की निवडणुकीनंतर प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी मोठा विरोधीपक्ष म्हणून विधानसभेत जाईल. मात्र, सध्याच्या घडामोडीतून भाजप मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षात बसणार असल्याचं आज स्पष्ट झालं आहे.
विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यांच्या जोरावर त्यांचं संख्याबळ ११८ पर्यंत गेलं. परंतु, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ – अर्थात भारतीय जनता पक्ष-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वादाची ठिणगी पडली आणि त्याचा भडका उडाला. त्यामुळे ३० वर्षांपासूनचे हे मित्र सरकारस्थापनेसाठी एकत्र आले नाहीत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी शिवसेनेनं लावून धरली, भारतीय जनता पक्षावर शब्द फिरवत असल्याचा – खोटेपणाचा आरोप केला. याउलट, असा शब्द दिलाच नव्हता, या भूमिकेवर भारतीय जनता पक्ष ठाम राहिली. त्यामुळे ‘भाऊबंध’ संपला आणि ‘भाऊबंदकी’ सुरू झाली. अखेर, आपण सरकार स्थापन करू शकत नसल्याचं भारतीय जनता पक्षानं रविवारी संध्याकाळी राज्यपालांना कळवलं.
शिवसेनेला काँग्रेस आणि एनसीपीने पाठिंबा दिल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी यांचं सरकार येणार हे आता स्पष्ट झालं आहे. भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी बोलवलं. त्यानंतर दिवसभर एनसीपी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर शिवसेना सरकार स्थापन करणार हे नक्की झालं आहे. सत्ता स्थापनेसाठीचा दावा शिवसेना करणार आहे.
Congress interim President Sonia Gandhi and Shiv Sena Chief Uddhav Thackeray had a brief telephonic conversation a short while back pic.twitter.com/DfgYPbW5kD
— ANI (@ANI) November 11, 2019
दरम्यान, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे नुकतेच राजभवनवर पोहोचले असून, त्यांच्यासोबत शिवसेनेतील इतर नेतेमंडळी देखील उपस्थित आहेत. त्यामुळे दिवसभरातील धावपळीत सध्या शिवसेनेने बाजी मारल्याचे चित्र असून, राज्यात शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समर्थनाची पत्रं मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.
Maharashtra: Shiv Sena leader Aaditya Thackeray and other leaders of the party reach Raj Bhavan, in Mumbai. pic.twitter.com/6dL1yiMm9C
— ANI (@ANI) November 11, 2019
