मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी सोनिया गांधींचे निकटवर्तीय अहमद पटेल, के. सी वेणुगोपाळ आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. राष्ट्रवादीला राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. आज सकाळी शरद पवार यांची सोनिया गांधी यांच्यासोबत फोनवरुन चर्चा झाली असल्याची माहिती के. सी वेणुगोपाळ यांनी दिली.

दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी सत्ता स्थापनेसंबंधी महत्वपूर्ण विधान केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणूकपूर्व आघाडी झाली होती. आमची राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर चर्चा सुरु आहे. आम्ही अंतिम निर्णय एकमताने घेऊ. राष्ट्रवादी बरोबर चर्चा झाल्यानंतरच पुढची भूमिका जाहीर करु असे मल्लिकार्जून खर्गे म्हणाले.

सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याचं उघड झालं असतानाच, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फोनवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी आज सकाळी चर्चा केली. पुढील चर्चेसाठी सोनिया गांधी यांनी अहमद पटेल, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि माझी नेमणूक केली आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाळ यांनी दिली. आता हे तिघेही मुंबईला रवाना होणार आहेत. ते शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळं राज्यातील सत्तापेच सुटणार का? याबाबत उत्सुकता आहे.

आघाडीची गोड बातमी! अहमद पटेल, खर्गे आणि वेणुगोपाल पवारांच्या भेटीला