मुंबई : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यात सोमवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीदरम्यान महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत चर्चा झाल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्र ‘द इंडियन एक्सप्रेस’ने (The Indian Express) दिली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी (Congress-NCP) यांच्यातील सत्तेचा फॉर्म्युला देखील ठरल्याचं वृत्तपत्राने म्हटलं आहे.
त्यानुसार संख्याबळाप्रमाणे मंत्रीपदाचं वाटप करण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्रीपद हे ५ वर्षासाठी शिवसेनेकडेच असणार आहे. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच मुख्यमंत्री व्हावं असा देखील आग्रह असणार आहे. तर काँग्रेस आणि एनसीपीचा उपमुख्यमंत्री असणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे.
विधानसभेत असलेल्या संख्याबळाच्या आधार तिन्ही पक्षांमध्ये मंत्रीपद वाटून घेण्यात येणार असून यानुसार शिवसेनेकडे १५, एनसीपी’कडे १४ आणि काँग्रेसकडे १३ मंत्रीपदं असणार आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेने ५६, राष्ट्रवादी ५४ आणि काँग्रेस ४४ जागांवर विजयी झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे द्यायचा याचा निर्णय काँग्रेस आणि एनसीपीकडे सोपवला आहे. सध्या काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर काँग्रेस आणि एनसीपीचा उपमुख्यमंत्री? सविस्तर वृत्त – https://t.co/aLatkVUDFt#Source Indian Express pic.twitter.com/EHszvgfuKN
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) November 19, 2019
परंतु, काल सोनिया गांधींशी झालेल्या बैठकीत सत्तावाटप आणि शिवसेना यांच्याबाबत चर्चाच झाली नसल्याची गुगली शरद पवार यांनी टाकल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. शरद पवार म्हणाले की, आम्हाला राज्यपालांनी ६ महिन्याचा अवधी दिलेला आहे. आम्ही राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. शिवसेनेनं १७० आमदारांचा आकडा कुठून आणला याची कल्पना नाही, हा प्रश्न शिवसेना नेत्यांना विचारा असं पवार म्हणाले मात्र पत्रकारांनी सांगितलं की, काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे असा दावा शिवसेना करतंय त्यावर पवारांनी आम्ही सगळ्यांसोबत आहोत असं सांगितल्याने पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला होता.
