नवी दिल्ली: राज्यातील भारतीय जनता पक्षाचं सरकार अवघ्या साडेतीन दिवसात पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा चांगलेच संतापले दिसले, जनादेशाचा अनादर करण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे. विचारधारा आणि युतीधर्माच्या विरोधात त्यांनी काम केलं आहे. शिवसेनेचा एकही आमदार असा नाही ज्यांनी त्यांच्या बॅनरवर फोटो लावून मतं मागितली नाही, आदित्य ठाकरेंनी तेचं केलं असा अमित शहांनी टोला लगावला.

महाराष्ट्रातील राजकीय लढाईत पीछेहाट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. शरद पवारांनी भारतीय जनता पक्षावर डाव उलटवला अशी चर्चा असतानाच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या घडामोडींवर मौन सोडलं आहे. ‘अजित पवार हे एनसीपी पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते असल्यानं भारतीय जनता पक्षानं त्यांच्यावर विश्वास ठेवला होता,’ असं अमित शहा यांनी सांगितलं.

आम्ही अजित पवारांकडे गेलो नव्हतो तर अजित पवाराच आमच्याकडे आले होते. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ नेता निवडले गेले होते. सरकार बनवण्यासाठी ते अधिकृत नेते होते. राज्यपालांनी देखील भारतीय जनता पक्षाचे सरकार बनवण्याबाबत अजित पवारांशीच चर्चा केली होती. एनसीपी’ने जेव्हा पहिल्यांदा सरकार बनवण्यास असमर्थता दाखवली होती, तेव्हा देखील त्या पत्रावर अजित पवारांची स्वाक्षरी होती. त्यानंतर आमच्याजवळ जे आमदारांच्या पाठींब्याचे पत्र आले होते त्यावर देखील अजित पवारांची स्वाक्षरी होती. दरम्यान, अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याच्या फाईल बंद करण्यात आल्याच्या वृत्तावर ते म्हणाले, असे कुठलेही खटले मागे घेण्यात आलेले नाहीत.

बॅनरवर मोदींचा फोटो लावून आदित्य ठाकरे आणि सेनेच्या आमदारांनी मतं मागितली: अमित शहा