मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्यात येणार आहे. तसेच भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल आणि राज्यातील जनतेला १० रुपयांत जेवण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज त्यांच्या अभिभाषणातून दिलं.

पुढे राज्यपाल म्हणाले, “वाढती बेरोजगारी कमी करण्याला सरकारचे प्राधान्य आहे. रोजगारनिर्मिती आणि भूमिपुत्रांना नोकऱ्यांसाठी शासन कायदा करेल. शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी सर्व उपाययोजना हाती घेणार. त्यातून प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यात येईल. मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासासाठी विशेष स्तरावर शासनाकडून प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याचा प्रयत्न सरकार करेल,”असंही राज्यपाल आपल्या भाषणात म्हणाले.

दरम्यान, आज विधानसभेच्या अध्यक्ष आणि विरोध पक्षनेत्याची निवड करण्यात आली. यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. विकासकामांची माहिती मागवणार आहे. त्यावर किती खर्च झाला, किती कामे शिल्लक आहेत, कुठे होत आहेत. कामे का अडली आहेत, किती प्रगती झाली आहे. तातडीची कामे कोणती आणि कमी महत्वाची कामे कोणती, याचा लेखाजोखा मी मागविला असल्याचे सांगत फडणवीस सरकारच्या काळातील विकास कामांची श्वेतपत्रिकाच काढणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. तसेच मंत्रिमंडळाचा तात्पुरता विस्तार करणार असल्याचे ते म्हणाले.

ठाकरे सरकार फडणवीसांच्या काळातील विकास कामांची श्वेतपत्रिका काढणार