नागपूर : राज्यातील राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे. मंगळवारी म्हणजे ७ जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भारतीय जनता पक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी मोठे विधान केले आहे. “जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संघांचे हिंदूत्व मान्य असेल. तर ते भारतीय जनता पक्षासोबत येतील,” अशी प्रतिक्रिया मा. गो. वैद्य यांनी दिली.

“राज्याची पूनर्रचना होणं आवश्यक आहे. यानंतर विदर्भ वेगळा होईल. कोणत्याही राज्याची लोकसंख्या तीन कोटींच्या वर आणि एक कोटीच्या खाली नको, असं यापूर्वी अनेकांनी सांगितलं आहे. यामुळेच गोवा महाराष्ट्रापासून वेगळं आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येप्रमाणे महाराष्ट्राचे तीन किंवा चार भाग होतील. छोट्या राज्यांसाठी केंद्र सरकारनं प्रांत रचना आयोग नेमला पाहिजे,” असंही ते यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी राज्य विभाजनाच्या मुद्द्यावरून २०१६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मारलेल्या व्यंगचित्ररूपी फटकाऱ्यांमुळं भारतीय जनता पक्ष संतापला होता. ‘निवडणुका जवळ आल्या की काही कार्टुनिस्टना धुमारे फुटतात,’ अशी टीका भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भासोबतच स्वतंत्र मराठवाड्याच्या केलेल्या मागणीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते मा. गो. वैद्य यांनी पाठिंबा दिला होता. संघाच्या परिभाषेत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा-खान्देशचा समावेश असलेला देवगिरी अशी ४ राज्ये आहेत. राज्य पुनर्रचना आयोग नेमून ही राज्य वेगळी करायला हवीत,’ असं मत वैद्य यांनी मांडलं होतं आणि त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं होतं.

 

Web Title:  RSS Senior Leader M G Vaidya talked about MNS and BJP alliance over Hindutva Agenda.

जर मनसेला संघांचे हिंदूत्व मान्य असेल तर ते भाजपा’सोबत येतील: मा. गो. वैद्य