नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आपले संकल्प पत्र प्रसिद्ध केले. राष्ट्रीय राजधानीत पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना २ रुपये किलो दराने गव्हाचे पीठ देण्यात येईल, असे भारतीय जनता पक्षाने यात वचन दिले आहे. त्याचबरोबर ईटीडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांना ‘बेटी बचाव योजनें’तर्गत सायकल आणि ई-स्कूटी वाटप करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. इतकेच नव्हे तर दिल्लीत सरकार स्थापल्यानंतर १० नवीन महाविद्यालये सुरू करण्याचे आश्वासनही भारतीय जनता पक्षाने आपल्या संकल्प पत्रात दिले आहे. भारतीय जनता पक्षाने १० नवी आश्वासने या संकल्प पत्रात दिली आहेत.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार मनोज तिवारी यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. गेल्या ३ वर्षात सीलिंग कायद्यामुळे व्यापाऱ्यांतचे कंबरडे मोडले. त्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला आहे. सीलिंग समस्या सोडवू, कायद्यात बदल करू असे भारतीय जनता पक्षाने जाहीरनाम्यात म्हटले आहे. दिल्ली देशाचे हृदय आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत आम आदमी पार्टीला टक्कर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रयत्न केले आहेत. मात्र, दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाच जास्त पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पुन्हा केजरीवाल यांचे सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता भारतीय जनता पक्षानेही जनतेला आकर्षित करण्यासाठी काही मोफत देण्याची घोषणा आपल्या संकल्प पत्रात केली आहे. त्यामुळे दिल्लीतील मतदार आता भाजपकडे आकर्षित होणार का, याचीच उत्सुकता आहे.

देशासाठी अभिमानाचे शहर आहे. भाजपाचा इतिहासदेखील याच शहराशी संबंधित आहे. आधी अटलबिहारी वाजपेयींचे सरकार होते. आता नरेंद्र मोदींचे सरकार आहे. पुढच्या ३ वर्षात दिल्ली-मुंबई अंतर केवळ १२ तासांमध्ये पूर्ण करता येईल. जाहीरनाम्यात केवळ घोषणाही असे नमूद करून गडकरी म्हणाले, ११ लाख लोकांकडून मत मागवली तेव्हा कुठे हा जाहीरनामा तयार झाला आहे.

 

Web Title:  BJP Manifesto for Delhi Assembly Elections 2020 Union Minister Nitin Gadkari.

दिल्ली निवडणूक: २ रुपये किलो पीठ आणि मुलींसाठी मोफत स्कूटी; भाजपचा जाहीरनामा