नाणार : सत्ताधारी शिवसेनेकडच्या उद्योग खात्यानेच नाणार प्रकल्पसंबंधित अध्यादेश काढला होता तसेच स्थानिक खासदार आणि आमदार सेनेचे असून सुद्धा विनाशकारी नाणार रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये आलाच कसा असा आरोप करून नाणारवासी उद्धव ठाकरेंवर संतापले आहेत. शिवसेनेची नाणार संबंधित भूमिका ही दुपट्टी असून त्यांचा विरोध हा केवळ दिखावा असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाणारच्या दौऱ्यावर जाऊन सभा घेणार आहेत. परंतु नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या या सभेला तीव्र विरोध दर्शविला आहे. आधी उद्योग विभागाने काढलेला अध्यादेश रद्द करा, अन्यथा नाणारमध्ये येऊ नका, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्या नाणार दौऱ्याला प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शवला आहे.
नाणार मधील परिस्थिती सध्या अधिक चिघळत असून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेना पक्ष हा सत्तेत शामिल असून त्यांचेच खासदार आणि आमदार येथील प्रतिनिधी असून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या उद्योग खात्यानेच प्रकल्पासंबंधित तसा अध्यादेश काढला होता, त्यामुळे नाणारवासियांनी एकूणच शिवसनेच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केलं आहे.
सध्या कोकणातील राजकीय वातावरण शिवसेनेसाठी पोषक राहील नसून परिस्थिती अशीच चिघळत राहिली तर शिवसेनेला त्याचे मोठे दुष्परिणाम येत्या निवडणुकीत भोगावे लागू शकतात असं राजकीय विश्लेषक मत व्यक्तं करत आहेत.
