महाड : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पक्षविस्तार, कार्यकर्त्यांचे मेळावे तसेच महाराष्ट्र सैनिकांच्या भेटी साठी कोंकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान महाड मधील वास्तव्यात त्यांना चवदार तळ्याला भेट देण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी थेट चवदार तळ्याला भेट दिली जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता.
याच ठिकाणावरून सामाजिक सशक्तीकरणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता आणि जो आजही आपण महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून ओळखतो. त्या ठिकाणाला त्यांनी पुष्पहार घालून वंदन केले आणि बराच वेळ तेथे आजूबाजूची पाहणी सुद्धा केली. त्यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर आणि अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज ठाकरे यांना मानणारा एक मोठा कोंकणी वर्ग आहे. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूका आणि त्यासाठी महत्वाचा पक्ष विस्तार लक्षात घेऊन मनसे अध्यक्ष कोंकण दौऱ्यावर असून ते अनेक स्थानिक लोकांच्या, समाजसेवी संस्थांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन तिथल्या मूळ समस्या समजून घेत आहेत. रत्नागिरीतील नाणार रिफायनरी संदर्भात सुद्धा राज ठाकरे यांनी याआधी नाणारला भेट देऊन तेथे प्रकल्प बाधित गावकऱ्यांना संबोधित केले होते.
