मुंबई : कालच भाजप आणि सेनेमधील दुरावा दूर करण्यासाठी आणि आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि तब्बल दोन तासाहून अधिक वेळ चर्चा केली.
आज संध्याकाळी ६ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून त्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे कालच्या अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाष्य करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मुंबईत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हे एक प्रकारे शक्तिप्रदर्शन असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे. लवकरच मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षकपदाची निवडणूक होत आहे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद दाखविण्यासाठी या मेळाव्याच आयोजन करण्यात आलं आहे.
