नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने ‘देश वाचवायचा असेल तर आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींनाच मत द्या’ असं विधान केलं आहे. सध्या भाजपचं ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान सुरु असलं तरी बॉलिवूड’मधील काही जुन्या संपर्कात असलेल्या अभिनेत्रीची समर्थनाची आणि मतदानाची वक्तव्य २०१८ मध्येच येण्यास सुरुवात झाली आहे असंच म्हणावं लागेल.
नरेंद्र मोदींच समर्थन करताना कंगना म्हणते की,’देश वाचवायचा असेल तर आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींनाच मत द्या, ‘आपला देश आर्थिक, सामाजिक रुढी-परंपरा अशा अनेक गोष्टींमुळे संकटात सापडला आहे. त्यामुळे तो एकप्रकारे खड्ड्यातच अडकला आहे असं वाटतं. जर आपल्या देशाला या संकटामधून वाचवायचं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदीच करु शकतात. खरंतर या संकटातून, खड्ड्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी पाच वर्ष हा फारच कमी कालावधी आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा देऊन पुन्हा एकदा आपला देश वाचविण्यासाठी साऱ्यांनीच हातभार लावा’, असं कंगणा म्हणाली.
कंगना’ची मोदींवरील स्तुती सुमनं इथेच थांबत नाहीत तर ती पुढे म्हणाली की, देशाला सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक योग्य व्यक्ती आहेत. त्यांना वारसाहक्काने पंतप्रधान पद मिळालं नसून त्यांनी मेहनत आणि संघर्ष करत हे पद मिळविलं आहे. लोकांच्या पाठिंब्यामुळे ते या पदी विराजमान आहेत आणि या साऱ्याचा मान राखत देशाची बिघडलेली घडी नीट बसवायचाही प्रयत्न करत आहे’. यापूर्वी सुद्धा कंगनाने मोदींची स्तुती केली असून ती मोदींची मोठी चाहती आहे असं तिने अनेक वेळा म्हटलं आहे.
