लखनऊ : उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री मुकुट बिहारी वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाबद्दल धक्कादायक विधान केलं आहे. राम मंदिराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी विधान केलं की, ‘सर्वोच्च न्यायालय आमचंच आहे, राम मंदिर होणारच’, असं धक्कादायक विधान केलं आहे. पुढे ते म्हणाले की, न्यायपालिकाच नव्हे तर प्रशासन, देश आणि राम मंदिरही आमचंच आहे’, असंही त्यांनी माध्यमांना ठासून सांगितलं.
लोकसभा निवडणुकीपूर्वी सध्या भाजपचे नेते स्फोटक वक्तव्य करत आहेत. परंतु आता त्यांनी थेट न्यायालयीन व्यवस्थाच आमच्या हातात असल्याची विधानं करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वेगळ्याच वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. याआधी सुद्धा भाजपच्या अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी वेगवेगळी धक्कादायक विधान केली होती.
परंतु प्रसार माध्यमांनी त्यांच्या या विधानानंतर चांगलच रान उठवलं आणि त्यांनी पुन्हा सारवासारव करण्यास सुरुवात केली. आपण या देशाचे नागरिक आहोत, त्यामुळे देशाच्या न्यायालयीन व्यवस्थेवर आपला संपूर्ण विश्वास आहे, असं मी म्हणालो होतो. कोर्टावर सरकारचा अंमल आहे, असं मी म्हणालो नव्हतो, अशी सारवासारव मंत्री महोदयांनी केली.
