नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्वाच्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित अशा बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक या ३ बँकांचे विलीनीकरण होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच या संदर्भातील अधिकृत घोषणा केली. एसबीआय’च्या सहयोगी बँकांच्या विलीनीकरणानंतरचे बँकींग क्षेत्रातील हे दुसरे महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे.
या महत्वाच्या ३ बँकांच्या विलीनीकरणामुळे तयात होणारी नवी बँक ही देशातील तिसरी सर्वात मोठी बँक असेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय वित्त सेवा सचिव राजीव कुमार यांनी प्रसार माध्यमांना दिली. केंद्र सरकारने याआधीच बजेट दरम्यान बँकांचे विलीनीकरण केले जाईल, अशी अधिकृत घोषणा केली होती. तो आमच्या सरकारचा अजेंडा आहे आणि त्यासाठी आम्ही हे पाऊल टाकले आहे, असे अर्थमंत्र्यांनी यांनी सांगितले.
दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील या तिन्ही मोठ्या बँकांच्या विलीनीकरणामुळे कर्मचार्यांनी चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. यामध्ये कर्मचार्यांच्या हिताचे रक्षण करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ट्विट अरुण जेटली यांनी केले आहे. यापूर्वी स्टेट बँकेच्या ५ सहयोगी बँकांचे विलीनीकरण करण्यात आले होते.
