नवी दिल्ली: दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के घसघशीत वाढ केली असून मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. १ जुलैपासून ही वाढ लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. याआधी महागाई भत्त्यात केवळ २ ते ३ टक्क्यांनी वाढ व्हायची. मात्र मोदी सरकारनं महागाई भत्ता ५ टक्क्यांनी वाढवल्याचं जावडेकर म्हणाले. सध्या केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना १२ टक्के महागाई भत्ता मिळवतो. आता तो १७ टक्क्यांवर गेला आहे.

महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्यात आल्यानं सरकारी तिजोरीवर १६,००० कोटींचा भार पडेल. मोदी सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचा लाभ सध्या सेवेत असलेल्या ५० लाख कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती घेतलेल्या ६५ लाख कर्मचाऱ्यांना होईल, असं जावडेकर म्हणाले. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच मोठं गिफ्ट मिळालं आहे.

दिवाळी: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ