मुंबई : स्वीडिश टेलिकॉम कंपनी इरिक्सनने भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांच्या आरकॉम कंपनी विरुद्ध कायदेशीर लढाई तीव्र केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही अनिल अंबानी यांच्या कंपनीने अजून ५५० कोटी रुपयांची भरपाई इरिक्सनला दिलेली नाही. त्यामुळेच अखेर अनिल अंबानीसह रिलायन्सच्या इतर २ बड्या अधिकाऱ्यांना भारत सोडून जाण्यास मनाई करावी, अशी मागणी करणारी याचिका इरिक्सनने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.
इरिक्सनने अनिल अंबानींच्या आरकॉमच्या अखिल भारतीय टेलिकॉम नेटवर्कला ऑपरेट तसेच मॅनेज करण्यासाठी २०१४ साली ७ वर्षाचा करार केला होता. त्यानुसार या करारापोटीचे ५५० कोटी रुपये आरकॉमने इरिक्सनला दिलेच नाहीत. त्यामुळे इरिक्सनने अखेर न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे अनिल अंबानींच्या आरकॉमवर ४६,००० कोटींचं कर्ज आहे.
तत्पूर्वी ३० सप्टेंबर रोजी कर्ज फेडण्याचं आरकॉमने नक्की केलं होतं. परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाही. त्यामुळे अखेर इरिक्सनने पुन्हा न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे आरकॉम भारतातील कायद्यांचं पालन करत नसल्याचं आणि भारतातील कायद्यांना गंभीर घेत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय अनिल अंबानींना देशाबाहेर जाण्यास न्यायालयाकडून मज्जाव करण्यात यावा असं याचिकेत म्हटलं आहे.
या याचिकेनंतर आरकॉमने इरिक्सनची भरपाई देण्यासाठी अजून साठ दिवसांची मुदत मागितली आहे. स्पेक्ट्रमची विक्री पूर्ण न झाल्यानेच त्यांनी ही मुदत वाढवून मागितली आहे.
