मुंबई: पीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही. या बँकेच्या खातेदारांनी माझ्यासमोर आंदोलन केलं. लुटारुंनी बँक लुटली आता खातेदारांचं काय हा प्रश्न निश्चितपणे महत्त्वाचा आहे. या खातेदारांचा आवाज मी आरबीआयच्या गव्हर्नरपर्यंत पोहचवेन मात्र या घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात दाखल झाल्या त्यावेळी त्यांच्यासमोर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी त्यांच्यासमोर आंदोलन केलं आणि आमचे पैसे आम्हाला परत द्या अशी मागणी केली. परंतु या घोटाळ्याशी केंद्र सरकारचा संबंध नाही असं अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटलं आहे.

मुंबईत आलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पक्षाच्या नरिमन पॉईंटमधील कार्यालयात जात असताना त्यांना पीएमसी बँकेच्या ग्राहकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पीएमसी बँकेवर लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या ग्राहकांशी सीतारामन यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकारांना संबोधित केलं. आज संध्याकाळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याशी बोलून ग्राहकांना होणाऱ्या त्रासाची माहिती त्यांना देईन, असं सीतारामन म्हणाल्या. ग्राहकांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी त्यांना विनंती करेन, असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं.

पंजाब महाराष्ट्र बँकेतील आर्थिक अनियमिततेप्रकरणी दिल्लीतही आंदोलन झालं. बँकेतील अनियमिततेला जबाबदार असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी खातेधारकांनी केली. या प्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष आणि एचडीआयएलच्या दोन संचालकांच्या पोलीस कोठडीत १४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पीएमसीतील एकूण आर्थिक अपहार ४३५५ कोटी रुपयांचा आहे.

दरम्यान, भारतीय लष्कराच्या शौर्याचं श्रेय लाटून, थेट लष्कराच्या नावाने निवडणुकीत मतांचा जोगवा मागणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सध्या पीएमसी बँकेबाबतच्या विषयावरून जवाबदारी स्वकारता येत नाही. कारण त्यामुळे मतं मिळणार नाहीत हे भाजपाच्या नेत्यांना माहित असावं. वास्तविक यापूर्वी आरबीआयच्या कक्षेत हस्तक्षेप करण्याऱ्या मोदी सरकारमधील मंत्री सध्या सर्व जवाबदारी आरबीआय’वर ढकलत आहेत हे विशेष म्हणावे लागेल. त्यात भाजपशी संबंधित अनेक लोकं याच पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर होते याचा देखील त्यांना विसर पडल्याचं दिसत आहे.

 

लष्कराच्या शौर्याचं श्रेय लाटणाऱ्या सरकारची पीएमसी बँकेसंबंधित जवाबदारी RBI’वर