नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये डेरा बाबा नानक-करतारपूर साहिब कॉरिडॉरवरुन सुरू असलेल्या वादादरम्यान पाकिस्तानला आणखी एक दणका मिळाला आहे. दरम्यान, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क संमेलनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, मोदी सरकारने पाकिस्तान सरकारचे हे निमंत्रण नाकारले असल्याचे वृत्त आहे.
२०१६ मध्ये भारतीय लष्कराच्या उरीमधील तळावर पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. अशा पार्श्वभूमीवर सार्कच्या परिषदेत भाग घेण्यास भारतासह इतर सर्व सदस्य देशांनी स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर तब्बल दोन वर्षांपासून पूर्णता ठप्प झालेली सार्क संवाद प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी राजधानी इस्लामाबादमधील सार्क परिषदेचे निमंत्रण काल भारताला देण्यात आले होते. परंतु, पाकिस्तान सरकारचे हे निमंत्रण आज भारताने फेटाळत इतर ७ देशांना न विचारता सार्क समिट भरवणारा आणि निमंत्रण देणारा पाकिस्तान कोण? असा सवाल भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला केला आहे.
