इस्लामाबाद : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तर देत कारवाई करेल या भीतीने पाकिस्तानने स्वतःच युद्धाची पूर्वतयारी करण्यात सुरुवात केली आहे. जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही परिस्थितीत भारताच्या दबावात येऊ नका असं सांगितलं असून यानंतरच पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरु केल्याचं दिसत आहे.

दरम्यान, २ कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तान युद्धाची तयारी करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. यामधील एक बलुचिस्तान येथील पाकिस्तान लष्कर तळावरील आहे. यासोबतच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक प्रशासनाला एक नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसवरुन पाकिस्तान भारताशी युद्धाची तयारी करत असल्याचं प्रथम दर्शनी स्पष्ट होत आहे.

क्वेट्टा कॅन्टोनमेंट स्थित पाकिस्तानी लष्कराच्या हेडक्वार्टर्स क्वेट्टा लॉजिलस्टिक्स एरियाकजून २० जानेवारी रोजी जिलानी रुग्णालयाला एक पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रात भारताशी युद्ध होण्याची शक्यता लक्षात घेत त्यानुसार वैद्यकीय मदतीसाठी सर्व तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

‘पूर्व फ्रंटवर आणीबाणी युद्ध परिस्थितीत क्वेट्टा लॉजिस्टिक परिसरात सिंध आणि पंजाबमधील सिव्हिल किंवा लष्कर रुग्णालयातून जखमी जवानांना आणलं जाऊ शकतं. प्राथमिक उपचारानंतर या जवानांना बलुचिस्तान येथील सिव्हिल रुग्णालयात शिफ्ट करण्याची योजना आहे’, असं HQLA चे फोर्स कमांडर एशिया नाज यांनी जिलानी रुग्णालयाच्या अब्दुल मलिक यांना लिहिलेल्या पत्रात लिहिलं आहे.

यामध्येही असंही सांगण्यात आलं आहे की, ‘लॉजिस्टिक्स परिसरात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय मदत मिळावी यासाठी योजना आखण्यात आली असून यामध्ये राज्यातील सर्व लष्कर आणि सिव्हिल रुग्णायलांचा समावेश आहे. लष्कर रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवण्यास सांगण्यात आलं असून सिव्हिल रुग्णालयांमध्ये जवानांसाठी पंचवीस टक्के बेड आरक्षित ठेवण्यास सांगण्यात आलं आहे’.

इतकंच नाही तर खासगी रुग्णालयांनाही २५ टक्के बेड आरक्षित ठेवण्यासोबत उपचाराच्या सर्व सुविधांसहित सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे. गुरुवारी पाकिस्तानव्याप्त काश्मीर सरकारने नीलम, जेहलूम, रावलकोट, हवेली, कोटली आणि भिंबर येथील स्थानिक प्रशासनाला पत्र पाठवत भारतीय लष्कर गोळीबार करु शकतो त्यामुळे त्याप्रमाणे तयारी करण्यास सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्ताने नियंत्रण रेषेवर लॉन्चपॅडवरील सर्व दहशतवाद्यांना तेथून हटवलं आहे. पीओके सरकारने लोकांना सुरक्षित रस्त्याचा वापर करण्याचा आवाहन केलं आहे. योसाबत कोणत्याही कारणाशिवाय नियंत्रण रेषेजवळ जाऊ नये, रात्रीच्या वेळी गरज नसल्यास लाइट लावू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबत गुरांनाही नियंत्रण रेषेवर नेऊ नये असे स्पष्ट निर्देश आहेत.

pakistan military preparing for war against india and order hospitals to be ready