नवी दिल्ली : भारत सरकारने जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या ३१ कोटी बँक खात्यांपैकी २० टक्के म्हणजे तब्बल ६ कोटी बँक खाती निष्क्रिय ठरली आहेत अशी माहिती खुद्द अर्थ राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी राज्यसभेत लिखित स्वरूपात ही माहिती दिली आहे.
गेल्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी २०१८ पर्यंत उघडण्यात आलेल्या एकूण ३१.२० कोटी जनधन खात्यांमध्ये सुमारे ७५ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. एकूण खात्यांपैकी २५.१८ कोटी खात्यांमध्ये देवाणघेवाण होणारे व्यवहार सुरु आहेत आणि पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत खोलण्यात आलेली तब्बल ६ कोटीहून अधिक खाती निष्क्रिय ठरली आहेत.
पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत ह्या फेब्रुवारीपर्यंत उघडलेल्या एकूण खात्यांपैकी तब्बल ५९ लाख बँक खाती बंद करण्यात आली आहेत. ती जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेली खाती खातेदारकाच्या विनंती वरूनच बंद करण्यात आल्याची माहिती अर्थराज्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिली आहे. १५ ऑगस्ट २०१४ मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती तर सुरुवात ही २८ ऑगस्ट २०१४ मध्ये करण्यात आली होती.
