नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं सर्व टेलिकॉम कंपन्यांना आदेश जरी केले आहेत. त्यानुसार मोबाइल फोनधारकांची खासगी माहिती पडताळणीसाठी अथवा नवीन सिम कार्ड कनेक्शन देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना ई-केवायसी’च्या नावाने ग्राहकाकडे आधार कार्डची मागणी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी हे तसे अधिकृत निर्देश सर्व टेलिकॉम कंपन्यांना जारी केले आहेत.
मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना म्हटलं होत की, ‘कायदेशीर तरतुदींच्या अभावामुळे खासगी कंपन्यांद्वारे होणारा आधार ई-केवायसी’चा वापर करणं बंद करण्यास सांगितले होते. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांसाठी तपशीलवार निर्देश जारी केले आहेत आणि त्याचे काटेकोर पालन केले जावे असं म्हटलं आहे. यामध्ये देशातील सर्व टेलिकॉम कंपन्यांना आधारद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात ई-केव्हायसीचा वापर करणं थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय, यासंबंधीचा संपूर्ण अहवाल ५ नोव्हेंबरपर्यंत देण्यास सांगितला आहे.
केंद्रीय दूरसंचार विभागानं आपल्या तीन पानांच्या परिपत्रकात नमूद केले आहे की, ग्राहकांच्या खासगी माहितीच्या पडताळणीसह त्यांना नवीन सिम कनेक्शन देण्यासाठी आधार ई-केवायसी’चा उपयोग केला जाऊ शकत नाही. दरम्यान, परंतु ग्राहक जर स्व-ईच्छेनं आधार कार्डची प्रत देत असेल तर कागदपत्रांच्या स्वरुपात त्याचा वापर केला जाऊ शकतो. परंतु, याचा केवळ ऑफलाइनच वापर केला जाऊ शकतो.
