मुंबई : मराठी संगीत जगतावर अनेक वर्ष आधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार यशवंत देव यांचे आज पहाटेच्या सुमारास वयाच्या ९१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. आज इस्पितळात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीतांना त्यांनी संगीतबद्ध केले. आज सायंकाळीच ४ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे वृत्त आहे.
काही दिवसांपासून त्यांच्यावर दादर येथील शुश्रूषा या खासगी इस्पितळात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अशक्तपणा आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, तपासणीनंतर त्यांना चिकुनगुनियाची लागण झाल्याचे समोर आले. त्याचबरोबर त्यांना न्यूमोनिया सुद्धा जडल्याचे निदान झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू होते.
त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ साली झाला होता. दरम्यान, वडिलांकडूनच त्यांना संगीताचे सुरुवातीचे धडे गिरवले होते. वडिलांकडूनच त्यांना तालाचे बाळकडू सुद्धा मिळाले. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले होते. भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘असेन मी नसेन मी’, ‘अखेरचे येतील माझ्या…’ ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘स्वर आले दुरुनी’, ‘तिन्ही लोक आनंदाने’, ‘जीवनात ही घडी’ अशा एक ना अनेक बहारदार गीतांना संगीतसाज चढवून यशवंत देव यांनी भावसंगीताचे विश्व समृद्ध केले होते. चित्रपटाबरोबरच अनेक नाटकांसाठीही त्यांनी महत्वाचं योगदान दिले आहे.
