नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधींनी आयएनएस विराटचा वापर टॅक्सीसारखा केला, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानामुळे भाजपा-काँग्रेसमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. राजीव गांधींनी सुट्टीसाठी आयएनएस विराटचा वापर केला, असा दावा मोदींनी केला होता. वास्तविक हे जर त्यांना आधीच माहित होतं आणि त्यांना भारतीय नौदलाबद्दल नितांत आत्मीयता होती तर मोदींनी नौदलाच्या गणवेशाचा जाहीर लिलाव करून त्यांच्या भावनांचा अपमान करणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारला INS सुमित्रावर रॉयल ट्रीटमेंट का दिली होती असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. वास्तविक अगदी नुकत्याच आलेल्या ‘फणी’ वादळामुळे देशातील अनेक राज्यात मोठी हानी झाली होती. त्याचा फटका अनेक राज्यांना बसला होता. मात्र भाजप किंवा भाजपच्या सहकाऱ्यांशी पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांना मदत करून त्याने समाजसेवेचा नवा पायंडा पाडला. तसा तो भाजपचा अघोषित ब्रँड अँबेसिडर आहे हे लपून राहिलेलं नाही. त्यामुळे अक्षय कुमार जे करेल ते अंतिम सत्य आणि खरी देशभक्ती असाच भाजप प्रेमींचा समज.

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्वीनकल खन्ना या दोघांनी नौदल गणवेशाचा लिलाव करून ‘भारतीय नौदलाच्या भावनांशी खेळत’ असल्याचा आरोप करत त्यांना काही महिन्यांपूर्वी कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली होती. अभिनेता अक्षय कुमारने ‘रूस्तम’ चित्रपटातील भारतीय नौदल अधिकाऱ्याचा गणवेश लिलावात ठेऊन जाहीरपणे विकल्यामुळे ११ लष्कर अधिकारी आणि इतर ८ अधिकाऱ्यांनी बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारला ही नोटीस पाठवली होती.

तसेच एका लष्करी अधिकाऱ्याने नौदलाचा स्वाभिमान असणाऱ्या वर्दीचा लिलाव न करण्याची विनंती अक्षय कुमारची पत्नी ट्विंकलला केली होती. परंतु तसे न केल्यास दोघांना थेट न्यायालयात खेचण्याचा इशारा या अधिकाऱ्याने अक्षय कुमार आणि ट्वीनकल खन्नाला दिला होता. अक्षय कुमारला सूचना पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये एका नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीचा आणि ७ निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश होता.

अभिनेता अक्षय कुमारने ‘रूस्तम’ चित्रपटातील भारतीय नौदल अधिकाऱ्याची भूमिका केली होती. परंतु त्यात तो गुन्हेगार दाखवला असल्याने हा नौदल गणवेशचा हा अवमान आहे आणि त्या भारतीय नौदलाच्या वर्दीवर वापरण्यात आलेले बॅजेस हे सुद्धा खरे असल्याने याचा गैरवापर होऊ शकतो. तसेच अशा जाहीर पब्लिक लिलावामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे असं या सूचनेत नौदलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

भविष्यातील खबरदारी म्हणून या सूचनेची प्रत संरक्षण मंत्रालय आणि जिथे लिलाव झाला- सॉल्ट स्काऊट त्या कार्यालयात पाठविण्यातल आली आहे. त्याद्वारे भविष्यात भारतीय चित्रपटांमध्ये लष्कराचे गणवेश वापरणे आणि त्यानंतर ते परस्पर जाहीर लिलावात विकणे अशा घटनांवर सरकारने त्वरित कारवाई व्हावी असं म्हटलं होतं. हे लिलाव म्हणजे लष्करासाठी अत्यंत अपमानकारक आहेत, त्यामुळे सिनेमातील अभिनेत्यांना असे करण्यापासून रोखण्यासाठी लगाम घालणे गरजेचे आहे असं म्हटलं आहे. अक्षय कुमारने नौदलाच्या वर्दीचा लिलाव करून लष्कराप्रती अनादर दाखवला असून त्याने लष्करातील अधिकाऱ्यांच्या, विधवा पत्नींच्या आणि निवृत्त अधिकाऱ्यांच्या भावना या लिलावमुळे दुखावल्या गेल्या आहेत अशी भावना त्यावेळी व्यक्त केली होती, मात्र प्रसार माध्यमांनी तो विषय जास्त महत्वाचा आणि स्वाभिमानाचा केला नाही आणि त्यातच दोघा पती पत्नीची खरी देश भावना समोर आली होती.

नौदलाच्या गणवेशाचा जाहीर लिलाव करून वर्दीचा अपमान करणारा अक्षय मोदींना माहित आहे का?