नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने चीनसह जगभरात धुमाकूळ घातला आहे. याचा थेट फटका चीनमधील भारतीयांनाही बसला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या चीनमधील वुहान शहरात अनेक भारतीय फसले आहेत. यापैकी ३२४ भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने आज भारतात आणण्यात आलं. ते सकाळी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले.

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊन आत्तापर्यंत २५९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ हजारांपेक्षा जास्त लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. या गंभीर परिस्थितीतून चीनमधल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी एअर इंडियाने एक विशेष विमान वुहानला पाठवलं होतं.

आज सकाळी ७.०० च्या सुमारासा हे विमान दिल्लीत दाखल झाले. वुहान येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पाठवण्यात आलेल्या विमानामध्ये दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील ५ डॉक्टरांचे पथक होते. तसेच पॅरा मेडिकल स्टाफ उपस्थित होता. या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक ती औषधे, मास्क, पाकीटबंद भोजन उपलब्ध होते. त्याशिवाय इंजिनियर्स आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचे एक पथकसुद्धा विमानात तैनात करण्यात आले होते.

 

Web Title:  Air India special aircraft arrived at Delhi Airport with 324 students.

कोरोना व्हायरस: चीनमधून ३२४ भारतीय विशेष विमानाने मायदेशी परतले