नागपूर: दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगाडिया यांनी केली आहे. राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी तोगडियांनी केली.

ते बुधवारी नागपुरातील प्रेसक्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत अयोध्येत राममंदिराच्या निर्मिर्तीसाठी १५ सदस्यीय ट्रस्टची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर तोगडिया यांनी पत्रपरिषदेत भाष्य केले. गुजरातच्या सोमनाथ मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात हमीर सिंह गोहिल यांचे योगदान होते. सोमनाथ मंदिरात जाणारे भाविक देवदर्शनापूर्वी गोहिल यांच्या स्मारकाचे दर्शन घेतात. त्याचप्रमाणे अयोध्येत राम मंदिर बनावे यासाठी आयुष्याची आहुती देणाऱ्या रामभक्तांचे अयोध्येत स्मारक बनविण्यात यावे, असे तोगडिया म्हणाले. पत्रपरिषदेला किशोर दिकोंडवार, अनुप जयस्वाल, तेजेंदरसिंह ठाकूर, हेमंत त्रिवेदी प्रामुख्याने उपस्थित होते.

एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे अशी मागणी होत असतानाच आता प्रवीण तोगडियांनी बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार दिला जावा अशी मागणी केली आहे. आता या मागणीचा विचार सत्ताधारी पक्षाकडून केला जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Web Title:  Balasaheb Thackeray including other 4 should get Bharat Ratna says former VHP President Pravin Togadia.

बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या! प्रवीण तोगडियांची जाहीर मागणी