लखनौ: उत्तर प्रदेशात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान राज्य सरकार, प्रशासन आणि पोलिसांकडून अराजकता पसरवण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला आहे. याबाबत सविस्तर माहितीचे १४ पानांचे एक पत्रही त्यांनी उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे भेट घेऊन सुपूर्द केले. आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदत प्रियंका गांधी यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना धमकी दिली जात आहे. ७७ वर्षीय माजी पोलीस अधिकारी दारापुरी यांच्या त्यांच्या घरातून अटक केली. त्यांचे नाव ४८ लोकांच्या यादीत आहे. आम्ही राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. भगवे वस्त्र परिधान करतात, ते आम्हाला शांती आणि करूणा शिकवतात. पण, सूडबुद्धीने वागायचे शिकवत नाहीत, असे म्हणत प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.

राज्यापालांना लिहिलेल्या पत्रात या घटनांची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. तसेच आंदोलनांदरम्यान पोलिसांनी तोडफोड केलेल्या खासगी आणि सार्वजनिक संपत्तीचे व्हिडिओ देखील सुपूर्द करण्यात आले आहेत. राम, कृष्ण यांसारख्या करुणापूर्ण देवांच्या देशात अशा घटना घडत असल्याचे दृर्देवी असल्याचे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

 

Web Title:  Congress leader Priyanka Gandhi Vadra Demand Judicial Investigation UP Police Brutality During Demonstrations.

#CAA : योगी सरकार आणि पोलिस यंत्रणा सूडबुद्धीने काम करत आहेत: प्रियंका गांधी