लखनऊ: उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबादमध्ये एका इसमानं ओलीस ठेवलेल्या २० लहान मुलांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुटकेच्या कारवाई दरम्यान एनएसजी कमांडोंशी झालेल्या चकमकीत आरोपी सुभाष बाथम मारला गेला आहे. तब्बल ११ तासांनंतर हे थरारनाट्य संपलं असून कारवाईत सहभागी असलेले पोलीस व एनएसजी पथकाला १० लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारनं केली आहे.

या कारवाईत पाच पोलिसांसह सहा नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच आरोपीच्या घरातून एक रायफल आणि पिस्तुलही जप्त करण्यात आली. काही लोकांनी आरोपीच्या गरावर दगडफेक केली. यामध्ये आरोपीच्या घराचा दरवाजा तुटला आणि याचाच फायदा पोलिसांना झाल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी या घराभोवती वेढा घातला होता. मात्र, सायंकाळपर्यंत पोलिसांना मुलांची सुटका करण्यात अपयश आले. यानंतर ओलीस ठेवलेल्या मुलांची आणि महिलांची सुटका करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाला बोलावण्यात आल्याची माहिती कानपूर मंडळाचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली होती. तसेच, राज्य सरकारकडून एनएसजी कमांडोची मागणी करण्यात आली. मात्र, ११ तासानंतर आरोपी सुभाषचा खात्मा करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना यश आले आणि मुलांची सुटका करण्यात आली.

 

Web Title:  Farrukhabad psycho man who held children hostage killed police encounter while all children are rescued.

उत्तर प्रदेश: थरारनाट्य संपलं; सुभाष बाथम मारला गेला; २० मुलांची सुटका