नवी दिल्ली : देशात सध्या रोजगारावरून परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली असल्याची आकडेवारी समोर आली आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. सरकारने देखील एक आकडेवारी मान्य केली आहे जॅमध्ये २०१७-१८ या कालावधीत बेरोजगारी मागील ४५ वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. मात्र विषय केवळ बेरोजगारांचा नसून तो सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकऱ्यांसंबंधित मजबुरीचा देखील आहे.

२०१७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार शहरातील अशिक्षित बेरोजगारांची आकडेवारी २.१ टक्के होती, मात्र शहरात उच्च शिक्षित बेरोजगारांच्या बाबतीत तीच आकडेवारी ९.२ टक्के होती. परिणामी शहरातील उच्च शिक्षित बेरोजगार मिळेल ती निकारी स्वीकारताना दिसत आहे. म्हणजे अगदी सामानाची ऑनलाईन होम डिलिवरी देणाऱ्या कंपन्यांमध्ये तब्बल २५,००० उच्च शिक्षित तरुणांनी डिलिवरी बॉय म्हणून निकारी स्वीकारली आहे. त्यामुळे अशिक्षित सोडा, इथे उच्च शिक्षित तरुणांची देखील रोजगाराच्या बाबतीत भीषण अवस्था असल्याचं दिसतं आहे.

दुसऱ्याबाजूला देशातील केवळ १३ टक्केच कंपन्या नवी भरती करण्याच्या मूडमध्ये असल्याचे आकडे समोर आले आहेत आणि त्यामुळे आगामी काळात देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतील अशी शक्यता कमी आहे. मात्र उच्च शिक्षण घेणारे तरुण एखाद्या मोठ्या कंपनीत ऑफिसमध्ये काम करण्याची स्वप्नं पाहत असतात, मात्र रोजगाराचीच वानवा असल्याने त्यांना उच्च शिक्षण असून देखील उन्ह पावसात प्रवास करून डिलिवरी बॉयची नोकरी करण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळत आहे.

नोकऱ्यांची कमी! उच्च शिक्षण घेऊन देखील तरुण डिलिवरी बॉय बनत आहेत