नवी दिल्ली: केंद्र सरकारने फ्रान्स खरेदी केलेल्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे राफेल घोटाळ्याच्या चौकशीचे दरवाजे उघडले असून आता याप्रकरणी गंभीरपणे चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या संबंधित काही कागदपत्रांचा आधार घेत आणि संबंधित न्यायाधीशांचा उल्लेख करत त्यांनी संसदेच्या लवकरच होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलणार असल्याचे संकेत दिले आहेत.

सदर प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने (Supreme Court of India) फेटाळून लावल्या आहेत. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या पीठाने राफेलवरील याचिंकावर सुनावणी केली. या सुनावणीत पीठाने राफेल विमान खरेदी (Rafael Fighter Jet Deal) वैध ठरवत याचिका फेटाळून लावल्या. यासोबतच राफेल व्यवहाराची सीबीआयद्वारे चौकशी करण्याच्या मागणीही कोर्टाने फेटाळली.

फ्रान्सच्या दसॉल्ट अ‍ॅव्हीएशन (French Dassault Aviation Rafael) कंपनीकडून राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या मुद्दय़ावर मोदी सरकारला निर्दोषत्व बहाल करणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकांवर सुप्रीम कोर्टात गुरूवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राफेल विरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. दरम्यान, राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात मागितलेली माफी सुप्रीम कोर्टाने मान्य केली. तसंच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं पंतप्रधानांविरोधात केलेली चौकीदार चोर हे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण होतं असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.

सुप्रीम कोर्टाने राफेलबाबत निकाल देऊनही कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. ‘लीक’ दस्तावेजांचा दाखला देत आरोप करण्यात आला होता की या करारात पंतप्रधान कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला अंधारात ठेवून हा व्यवहार केला होता. शिवाय विमानाच्या किमतीवर आक्षेप घेतही याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु कोर्टाने या सर्व याचिकाही फेटाळून लावल्या.

राफेल डील प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. मागील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं मोदी सरकारला धक्का दिला होता. त्यावर भाष्य करताना ‘आता सुप्रीम कोर्टा देखील म्हणतंय चौकीदार चोर है,’ अशी प्रतिक्रिया देत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) निशाणा साधला होता. त्यावर भारतीय जनता पक्षानं तीव्र आक्षेप घेतला होता. सुप्रीम कोर्टानं असं कोणतंही विधान केलेलं नाही. तरीही राहुल गांधी असं विधान करुन कोर्टाचा अवमान करत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर राहुल यांनी आपल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला होता. राफेल करारात कुठलीही अनियमितता झाली नसल्याचा निर्वाळा डिसेंबर २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाने दिला होता. परंतु, यावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.

जस्टीस जोसेफ यांनी राफेल घोटाळ्याच्या चौकशीचे द्वार खुले केले: राहुल गांधींनी ट्विट केले पेपर्स