नवी दिल्ली: वाहन चालकास शिस्त लागावी आणि वाहतुकीचे नियम पाळले जावेत यासाठी १ सप्टेंबर पासून देशभरात वाहतूकीचे नियम कडक करण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियमांचं पालन न केल्यास सक्तीने दंड वसुलीही प्रशासनाने सुरु केली आहे. तसेच नियम उल्लंघनाचे दंड देखील १० पटीने वाढवण्यात आले आहेत. मात्र याचा फटका मोटार वाहन चालकांना बसत आहे. कारण इतके दिवस बेशिस्तीने वाहन चालवण्याची सवय असल्याने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे वाहन चालकांना जड जात आहे. त्यामुळे या कठोर कारवाई बाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

देशभरात १ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियम मोडणाऱ्याला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाहतूक नियम मोडल्यास असणारी दंडाची रक्कम 10 पटीने वाढविण्यात आल्याने काही प्रमाणात लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे. अनेक जण समाज माध्यमाच्या माध्यमातून याचा विरोध करताना पाहायला मिळत आहे.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, आपल्याला कायद्याचा सन्मान करायला हवा तसेच कायद्याचा धाक लोकांमध्ये असायला हवा. जर वाहतूक नियमांचे उल्लंघन कराल आणि अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही गडकरींनी विचारला आहे.

कायद्याचा धाक लोकांमध्ये असायलाच हवा: नितीन गडकरी