अहमदाबाद : साबरकांठा येथे एका १४ महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याने गुजरातमध्ये सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर बलात्कारी आरोपी हा बिहारी असल्यामुळे उत्तर भारतीयांविरोधात संपूर्ण गुजरात मध्ये आंदोलन पेटलं आहे. त्यानंतर भेदरलेल्या उत्तर भारतीयांनी गुजरातमधून पलायन करण्यास सुरुवात केली असून, आता पर्यंत तब्बल ५० हजारांवरून अधिक युपी-बिहारींनी गुजरातच्या बाहेर पलायन केलं आहे.
चिमुकलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर नेहमीच शांत आणि संयमी असलेल्या गुजरातींचाही राग अनावर झाला असून युपी-बिहारच्या कामगारांना लवकरात लवकर गुजरात सोडून देण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. याबाबतचे अनेक व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर, जवळपास ५०,००० हून अधिक उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याचे वृत्त आहे.
राज्यातील युपी-बिहारींना हाकलून लावण्याची मोहिमच संपूर्ण गुजरातमध्ये सुरू झाली. त्यानंतर या आंदोलनाने मोठ स्वरूप धारण केले असून अनेक ठिकाणी उत्तर भारतीय नागरिकांना खूप मारहाण करण्यात आली आहे तसेच अनेकांना शोधून चोप दिला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ४२ गुन्हे दाखल केले आहेत. तर तब्बल ३४२ जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील ६ जिल्ह्यांमध्ये या घटना सर्वाधिक घडत आहेत.
