मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)होणाऱ्या चौकशीवरुन सध्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात शरद पवार स्वत:च उपस्थित राहणार आहेत. त्यांनी स्वत: आपण ईडी कार्यालयात जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना समर्थन दिलं आहे. शरद पवार राजकारणातले भिष्म पीतामह असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, ज्या बँक घोटाळ्यावरुन ईडीने एफआयआर दाखल केला आहे, त्या बँकेत शरद पवार कोणत्याही पदावर नव्हते. तक्रारदाराने आपण कधीही शरद पवारांचं नाव घेतलं नसल्याचं म्हटलं आहे. अण्णा हजारे यांनीदेखील त्यांना क्लीन चीट दिली आहे”.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जे राष्ट्रवादीच्या विचारांचे नाहीत त्यांनाही हे कसं घडलं ? हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात अशी परंपरा कधीच नव्हती, तपास यंत्रणांचा गैरफायदा कोणीच घेतला नव्हता. हे देशासाठी आणि राजकारणासाठी घातक आहे. काँग्रेसच्या राजवटीतही टोकाचं राजकारण झालं नव्हतं. सरकार हे भाजपाचं आहे आमचं नाही. तपास यंत्रणा त्यांच्या हातात आहेत अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

यापूर्वीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात सुडबुद्धीचं राजकारण करणं ही आपली संस्कृती नाही असं सांगत अप्रत्यक्षरित्या भाजपावर टीका केली होती. तसेच अमित शहा यांनी पवारांनी ५० वर्षात महाराष्ट्रासाठी काय केलं या प्रश्नावर सामनातून भाष्य करण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचं मोठं योगदान आहे हे विसरता येणार नाही असं उत्तर शिवसेनेने भाजपाला दिलं होतं. त्यामुळे एकंदर पाहता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार आहे का? याबाबत चर्चेला उधाण आलं आहे.

ज्या घोटाळ्यावरुन ईडीने FIR दाखल केला आहे, त्या बँकेत शरद पवार कोणत्याही पदावर नव्हते