नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. दरम्यान सर्व मंत्र्यांनी वेळेवर कार्यालयात हजर राहावे तसेच घरून काम करणे बंद करावे, असे थेट आदेश त्यांनी यावेळी दिले. शपथविधीनंतर प्रथमच पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांच्या भेट घेऊन त्यांना जबाबदारी सांभाळून कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले. मंत्र्यांनी पाच वर्षांचा कार्यक्रम आखून त्यानुसार काम करावे, चाळीस दिवसांच्या संसदेच्या अधिवेशनकाळात कुणीही बाहेरचे दौरे काढू नये, सर्व राज्यमंत्र्यांपर्यंत महत्त्वपूर्ण निर्णय वेळोवेळी पोहोचवावे, असेही त्यांनी म्हटले. काम सुरळीत आणि सुव्यवस्थित पार पडावे व इतरांपुढे आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मंत्री आणि खासदारांमध्ये फार अंतर नसते, त्यामुळे मंत्र्यांनी नव्याने निवडून आलेल्या खासदारांना भेटीसाठी वेळ दिला पाहिजे, अशी सूचनाही पंतप्रधानांनी यावेळी केली. गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपण वेळेवर कार्यालयात पोहोचत असू, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.
