नवी दिल्ली: देशाच्या संविधानातून धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख नेते आणि संयोजक नंदकुमार यांनी केली आहे. राज्यघटनेच्या सरनाम्यात असलेल्या धर्मनिरपेक्ष शब्दावर केंद्राने पुन्हा विचार करावा, हा शब्द पाश्चिमात्यांकडून आला असल्याचंही त्यांनी म्हटलं.

आरएससच्या एका पदाधिकाऱ्याच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात नंदकुमार बोलत होते. त्यावेळी आरएसएसचे जेष्ठ नेते कृष्ण गोपाल उपस्थित होते. नंदकुमार म्हणाले की, भारतात धर्मनिरपेक्ष शब्दाची गरज नाही. धर्मनिरपेक्ष असल्याचा बोर्ड लावण्याची खरंच गरज आहे का हे बघावे लागणार आहे. व्यवहार, काम आणि भूमिकेतून हे सिद्ध करावं लागणार आहे का असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

देशाच्या राज्यघटनेमध्ये भारत हा एक लोकशाही संघराज्य, स्वायत्त, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष देश असेल, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. मात्र यातील धर्मनिरपेक्ष या शब्दाबाबत नंदकुमार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. नंदकुमार म्हणाले की, ”धर्मनिरपेक्षता ही पाश्चात्य कल्पना आहे. ती पश्चिमेकडून आली आहे. वास्तविकदृष्ट्या ती पोपच्या वर्चस्वाच्या विरुद्ध आहे. भारताला धर्मनिरपेक्षतेची गरज नाही.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कृष्ण स्वामी अय्यर यांच्यासह संविधानाचे सर्व सदस्य या शब्दा विरोधात होते. त्यांनी धर्मनिरपेक्ष या शब्दाला संविधानाच्या प्रस्तावनेत समावेश करणे आवश्यक नाही, असे म्हटले होते. तरीही त्यांची मागणी त्या वेळी फेटाळण्यात आली व या शब्दाचा संविधानाच्या प्रस्तावनेत समावेश करण्यात आल्याचा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला. १९७६ साली ज्यावेळी इंदिरा गांधी यांनी धर्मनिरपेक्ष शब्दावर जोर दिला. त्यावेळी आंबेडकरांचे मत स्वीकारण्यात आले नव्हते, असेही ते म्हणाले.

 

Web Title:  RSS Leader Nandkumar Says secular word removed from Preamble of Constitution.

संविधानातून धर्मनिरपेक्ष शब्द वगळाः आरएसएस