मुंबई : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पेडर रोडवरील मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं. त्यांनी काल केलेल्या पंतप्रधानपदाच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. त्यांनी म्हटलं होतं, ‘जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळालं नाही आणि विरोधकांचं सरकार आलं तर पंतप्रधानपदासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे पंतप्रधानपदासाठी प्रमुख दावेदार असतील’, तसेच त्यांनी चौथ्या क्रमांकावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचंही नाव घेतलं.

दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर प्रसार माध्यमांवर अनेक बातम्या प्रसारित झाल्या. त्यांनी राहुल गांधींचं नाव चौथ्या क्रमांकावर घेतल्याने टीका झाली, अनेक चर्चा झाल्या. याबाबत आज बोलताना पवार म्हणाले, ‘अशा बातम्या छापणे हा खोडसाळपणा आहे’. टीआरपीसाठी अशी बातमी छापून आणल्याचा आरोपही त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांवर केला.

दरम्यान, माझ्यासाठी सगळ्याच निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मात्र आजचा दिवस देशासाठी महत्त्वाचा असून, यंदा लोक योग्य निर्णय घेतली. मुंबईकर मतदानात मागे राहणार नाहीत. मुंबईकर उत्साहाने मतदानाचा हक्क बजावतील, असा विश्वासही पवारांनी यावेळी व्यक्त केला.

तशी बातमी छापणे हा निव्वळ खोडसाळपणा आहे: शरद पवार