वाराणसी : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार, रामविलास पासवान, अतुल बरुआ यांच्यासहित इतर सहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. आजसुद्धा असेच विराट शक्तिप्रदर्शन होणार आहे. आज कोतवाल बाबा काळ भैरवाचे दर्शन घेऊन पुन्हा जयघोषाच्या मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोदी जाणार आहेत. त्यावेळी सम्राट मोदींचे मांडलीक असणारे राजे त्यांच्यासोबत अदबीने उभे राहणार आहेत.

काल दुपारी पावणेचार वाजता मोदींचे वाराणसीत आगमन झाले. त्यांच्यासोबत अनेक मंत्र्यांचा व नेत्यांचा ताफा होता. मोदींनी सर्व प्रथम काशी विश्‍वेश्‍वराचे दर्शन घेतले. मोदी यांच्या स्वागतासाठी वाराणसी शहराला भगवेमय करण्यात आले होते. मोदींच्या रोड शोचा सात किलोमीटरचा रस्ता भाजपाच्या चिन्हाच्या पताकांनी झाकून टाकण्यात आला होता. ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाचे भगवे झंडे लावण्यात आले होते. अनेक ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या. ‘नमो अगेन’ व ‘हर हर मोदी’ लिहिलेल्या टोप्या, स्कार्फ ठिकठिकाणी विकले जात होते. ‘मै भी चौकीदार’चे टी शर्ट सर्वत्र हारीने मांडले होते. कमळाची चित्रे असलेल्या साड्या, भगव्या कफनी विकणारे स्टॉल रस्त्याच्या दुतर्फा लागले होते. संपूर्ण वाराणसी भगवी झाली होती. मोदींनीही या गर्दीला साजेसाच भगवा सदरा घातला होता. मोदींच्या मिरवणुकीच्या गाडीवर 4 ब्लॅक कमांडो तैनात होते. तर मिरवणुकीतील हजारोंच्या गर्दीला काबूत ठेवण्यासाठी १६ आयपीएस अधिकारी आणि १०,००० पोलीस तैनात होते. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.

मोदींनी विश्‍वेश्‍वराचे दर्शन घेतल्यावर लंका भागातील बनारस हिंदू विद्यापीठाकडे ते गेले. तेथे त्यांनी भारतरत्न मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला हार घालून आपल्या विराट रथयात्रेला सुरुवात केली. ज्यावेळी मोदी काशी विश्‍वेश्‍वराचे दर्शन घ्यायला गेले तेव्हा मंदिराबाहेर भारतरत्न बिस्मिल्ला खान यांचे मुस्लीम शिष्य शहनाईवर ‘वैष्णव जन तो तेणे कहीए जे पीर पराई जाने रे’ हे गाणे वाजवीत होते. त्यानंतर त्यांनी ‘पायो जी मैंने राम रतन धन पायो’ हे गाणे अत्यंत तल्लीन होऊन वाजविले ते एकात्मतेचा संदेश देत होते.

मालवियांच्या पुतळ्याला वंदन केल्यावर मोदींनी खर्‍या राजकारण्यासारखे शक्तिप्रदर्शन केले. ढोल-ताशांच्या गजरात मोदींचा जयजयकार आसमंत भेदून टाकत होता. भगवा जनसमुदाय, होणारा जयजयकार आणि सोूबत असलेले दिग्गज नेते आणि तारे-तारका पाहून मोदींची छाती अभिमानाने फुलून आली. अस्सी चौराहा शिवाला, सोनारपुरा, मदनपुरा, गौदेलिया असे पडाव घेत घेत ही विराट मिरवणूक दशाश्‍वमेध घाटावर पोहोचली. या सात किलोमीटरच्या मार्गात 25 क्विंटल फुलांचा वर्षाव मोदी यांच्यावर करण्यात आला. दशाश्‍वमेध घाट व पुढे राजेंद्र प्रसाद घाटावर गंगा आरतीसाठी भव्य मंच उभारण्यात आला होता. आपल्या हजारो अनुयायांसह मोदींनी काळोख पडल्यावर गंगा आरती केली. रात्री मोदींनी वाराणसीतील हॉटेल ‘डी पॅरिस’ या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शहरातील बड्या 5000 हस्तींशी संपर्क साधला. त्यानंतर रात्री उशिरा वाराणसीच्या डिझेल रेल्वे इंजिन कारखान्याच्या पॉश गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्य केले.

मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना उद्धव ठाकरेंची वाराणसीत उपस्थिती