नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या नागरिकत्त्व वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. युनायटेड हिंदू फ्रंट आणि हिंदू महासभेकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सिजेआय रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका रद्द केली आहे. कोणत्याही परदेशी कंपनीत नागरिकत्त्व ब्रिटीश असल्याचे नमूद असल्यास व्यक्तीचे नागरिकत्त्व ब्रिटीश असेलच असे नाही, असे सांगत न्यायालयाने हिंदू महासभेला इतर पुरावे सादर करण्यास सांगितले. मात्र इतर पुरावे सादर करण्यात न आल्याने न्यायालयाने ही याचिका रद्द केली आहे.

दरम्यान, युनायटेड हिंदू फ्रंटच्या जयभगवान गोयल आणि हिंदू महासभेच्या चंद्रप्रकाश कौशिक यांनी दाखल केलेल्या याचिकेत, ‘गृहमंत्रालय यासंदर्भात आलेल्या तक्रारीवर लवकरच कारवाई करेल, असे म्हटले असून राहुल गांधींची उमेदवारी मागे घेण्याची मागणीही याचिकेत केली.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने राहुल गांधींना नोटीस जारी करून पंधरा दिवसांत उत्तर द्या, असे आदेश दिले होते. डॉ. स्वामी यांनी आपल्या तक्रारीत असे आरोप केले होते की, राहुल गांधी ब्रिटीश नागरिक असल्याने त्यांच्यावर योग्य कारवाई व्हायलाच हवी.

भाजप तोंडघशी! राहुल गांधींच्या नागरिकत्त्व वादावरील याचिका सुप्रीम कोर्टाकडून रद्द