नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेतील पक्षाच्या पराभवावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाष्य केले आहे. ‘देश के गद्दारों को’ यासारखी भाषा प्रचारादरम्यान वापरायला नको होती. प्रचाराच्या दरम्यान नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे पक्षाला नुकसान झाले, असे शहांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आम्ही जय-पराजयासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरत नाही. भाजप विचारधारा आणि विस्तार यावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी तुम्हाला राजकारणातील चाणक्य म्हटले जाते, तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला. असं विचारतानाच राजकाणातील खरे चाणक्य तुम्ही की शरद पवार असा थेट प्रश्नही केला गेला. यावर अमित शाह यांनी दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दिल्लीच्या आधी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपा सत्तेपासून वंचित राहिला आहे. यामध्ये शरद पवारांची भूमिका मोठी होती. त्याधर्तीवरच खरे चाणक्य कोण? तुम्ही की शरद पवार? महाराष्ट्रातील निकालानंतर राजकारणातील चाणक्य शरद पवार आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर शाह यांनी उत्तर देताना म्हटले की, ” मी चाणक्यनिती खूप वाचली आहे. ती समजून घेण्याचा प्रयत्नही केला आहे. चाणक्य यांच्याइतका मी महान नसून तसा विचारही करू शकत नाही. भगवान कौटिल्य (चाणक्य) यांच्याशी होणाऱ्या तुलनेबाबत मी विचारही करू शकत नाही. शरद पवारांबाबत बोलायचे झाल्यास ते दिग्गज राजकीय नेते आहेत. त्यांनी अनेक सरकारे पाडली आहेत. नवीन सरकारे स्थापनही केली आहेत असं अमित शाह म्हणाले.

दरम्यान, अमित शहा म्हणाले की, राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाल्यापासून मी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत सहभागी होता. दिल्ली निवडणुकीत पहिल्यांदा निकाल आमच्या विरोधात लागलेत असे नाही. यापूर्वीही आम्ही पराभव पाहिला आहे. तेव्हाही आम्ही चांगला प्रयत्न केला होता. मी भाजपचा एक कार्यकर्ता असून पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले.

 

Web Title: Union Home Minister Amit Shah denies that he is considers himself Chanakya.

पवार दिग्गज नेते, त्यांनी अनेक सरकारे पाडली अन नवी सरकारे स्थापन केली: अमित शाह